फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा आज सर्वत्र साजरी करण्यासाठी तयारी सुरु होती. होळी हा रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी आपल्याकडे होळीचं महत्व अनन्यसाधारण आहे. ग्रामीण भागात होळीला शिमगा म्हणून ओळखलं जातं. या सणामागे अनेक अख्यायिका आहेत. वाईट आचार-विचारांना तिलांजली देणं म्हणजेच आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून खाक करावी, हाच होळी साजरी करण्यामागचा हेतू आहे. होळी पेटवण्यासाठी लाकडं, झाडांच्या फांद्या जमवल्या जातात. रात्री होळीचं पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर होळी पेटवली जाते. होळी पेटवताना होळी रे होळी पुरणाची पोळी अशा घोषणाही दिल्या जातात. होळीच्या वेळी वातावरणात बदल झालेला असतो. हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरूवात झालेली असते. अशा वेळेला हवामानात आणि आपल्या शरीरातही बदल होत असतो. जेव्हा होळी प्रज्वलित केली जाते त्यावेळी त्याठिकाणी १४५ डिग्री सेल्सियस एवढं तापमान निर्माण होतं. आपल्या परंपरेनुसार आपण जर होळीला प्रदक्षिणा घातली तर या होळीतील उष्णतेमुळं आपल्या शरीरावरील सूक्ष्म जीवजंतू मरतात. तसंच होळीच्या दुस-या दिवशी होळीची विभूती जर कपाळाला लावली तर त्यातील चंदन, वेगवेगळी पाने, फुले, आंब्याची पाने यामुळं आपलं आरोग्य संपन्न होतं असं शास्त्रीय कारणही होळीमागे आहे.