हरिश्चंद्रगड येथे अडकलेल्या कल्याणच्या २० ट्रेकर्सची सुखरूप सुटका करण्यात यश आलं आहे. कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे २० ट्रेकर्स सोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकींगसाठी गेले होते. ते कोकणपाडा येथे १ हजार फूट खाली अडकले होते. जिल्हाधिका-यांनी त्या ट्रेकर्सची सुटका करण्याचे आदेश दिले होते. काल रात्री डॉ. अडवाणी यांच्याशी संपर्क झाला. त्यांच्यासोबत ५ महिला आणि १७ पुरूष होते. अंधार असल्यानं त्यांना मार्ग सापडत नव्हता. या सर्वांना कालची रात्र कोकणपाडा येथे काढावी लागली. हे सर्व ट्रेकर्स नंतर सुखरूप असल्याचा संदेश आला. या सर्वांची आज सुटका झाली आहे. मुंबई-औरंगाबाद येथील हे ट्रेकर्स ट्रेकींग आणि रॅपलिंगसाठी हरिश्चंद्रगडावर गेले होते. हरिश्चंद्रगड येथील स्थानिक गाईड निवृत्ती हा कोकणकडा ते बेलपाडा रॅपलिंग करत असताना त्यांचा पाय मधमाशांच्या पोवळ्यास लागला. त्यामुळे या ट्रेकर्सला सर्व सेटअप बदलावा लागला. यामुळं उशीर झाल्यामुळं या सर्वांना इथेच थांबून रहावं लागलं होतं. या सर्वांना दोरीद्वारे अन्न आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दिवस उजाडल्यानंतर या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.