घरातील प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता दहावीच्या वर्षातही काम करत शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे समाजासाठी प्रेरणादायी आहेत. प्रतिकुलतेमध्ये कमीतकमी गुण मिळवूनही उत्तीर्ण झाले तरी त्यांचे गुण सधन स्थितीतील मुलांना मिळालेल्या ९० ते ९५ टक्के गुणांबरोबर आहेत असे विचार सिनेनाट्य अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केले. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या २८व्या वार्षिक एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्था चालवत असलेल्या वंचित विद्यार्थ्यांसाठी दहावीमध्ये विशेष प्रशिक्षण देणा-या एकलव्य सक्षमीकरण योजनेची माहिती देण्यात आली. यावर्षी १३० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यापैकी ४५ मुलं झूमवरील कार्यक्रमाला उपस्थित होती. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांपैकी राहुल माने, पूजा पाटील, सृष्टी बावसकर, सायली दळवी, राधिका टमाटा, वैष्णवी कारंडे या विद्यार्थ्यांनी आपली संघर्ष कहाणी यावेळी कथन केली.