कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी पालिका आयुक्त एकीकडे मास्क घालण्याचं आवाहन करत असताना दुसरीकडे मात्र स्थायी समितीच्या बैठकीत काही अधिकारी, कर्मचारी आणि एखाद-दुसरी नगरसेविका वगळता सर्वच सदस्य मास्क लावायला विसरले होते. ठाण्यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध अधिक कडक करण्यात आले असताना आणि पालिका आयुक्त मास्क लावण्याविषयी सतत आवाहन करत असताना स्थायी समिती सदस्यांच्या या कृत्याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे. मास्क न लावल्यास दंडही ठोठावला जातो. मात्र स्थायी समितीच्या बैठकीतील दोन महिला नगरसेविका वगळता स्थायी समिती सभापतींसह इतर सर्व सदस्यांच्या चेह-यावर आज मास्क नव्हते. अधिकारी-कर्मचारी मात्र मास्क घालूनच दिसत होते. सर्वसामान्य माणसांना अगदी काही क्षणासाठी मास्क बाजूला केला तरी दंड झाल्याच्या घटना आहेत. मग आता पालिका आयुक्त मास्क लावण्यास विसरलेल्या स्थायी समिती सदस्यांवरही अशीच कारवाई करणार का असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.