सोमवारी होणा-या विधानसभा निवडणुकीच्या मतदानात जिल्ह्यामध्ये ६३ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. जिल्ह्यामध्ये ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदार आहेत. यामध्ये ३४ लाख ७९ हजार ५०८ पुरूष मतदार, २९ लाख १२ हजार ३८२ महिला मतदार आहेत. तसंच ४६७ तृतीयपंथी मतदार असून १० हजार ४८९ दिव्यांग मतदार आहेत. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात एकूण ६ हजार ६२१ मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यामध्ये ५९१ क्रिटिकल मतदान केंद्र असून २३ सखी मतदान केंद्र तर ११ दिव्यांग मतदान केंद्र आहेत. मतदानासाठी २९ हजार कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर निवडणूक प्रक्रियेसाठी १२ हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी अनेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत विनामूल्य पोहचवलं जाणार आहे. अंध मतदारांसाठी मतदान यंत्रावर ब्रेल लिपीत मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मतदारांना १९५० या हेल्पलाईनवर हवी ती मदत मिळवता येणार आहे. आज संध्याकाळी ६ वाजता निवडणुकीचा प्रचार हा बंद झाला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बहुतांश मतदान केंद्र ही तळमजल्यावर असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिली.