सातव्या आर्थिक गणनेच्या कामास सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत राष्ट्रव्यापी सातव्या आर्थिक गणनेची सुरूवात राज्यात झाली आहे. या गणनेकरिता नियुक्त करण्यात आलेले प्रगणक, उद्योग, व्यवसाय, सेवा यांची गणना घरोघरी प्रत्येक कुटुंबाला तसंच उद्योगांना प्रत्यक्ष भेटी देऊन करणार आहे. त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं आहे. यंदा प्रथमच पेपरलेस गणना होणार असून यात मोबाईल ॲपचा वापर होणार आहे. जिल्ह्यामध्ये आर्थिक गणनेसाठी ४ हजार ८२ प्रगणक आणि १ हजार २५ पर्यवेक्षक काम करत आहेत. देशामध्ये १९७७ साली पहिली आर्थिक गणना करण्यात आली. सहाव्या आर्थिक गणनेनुसार जिल्ह्यामध्ये ४ लाख ३८ हजार ७०६ आस्थापना होत्या. त्याद्वारे १४ लाख ४४ हजार ६६० रोजगार उपलब्ध झाले होते. आता यामध्ये झालेला बदल सातव्या आर्थिक गणनेद्वारे पुढे येणार आहे.