महापालिकेच्या विविध करांची वसुली करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे, अनधिकृत बांधकामे, धोकादायक इमारती यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी यावेळी दिल्या. महापालिकेची मालमत्ता कराची वसुली, पाणी बिल वसुली आणि इतर वसुलीबाबतची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेची वसुली प्राधान्याने करावी. त्याबाबत कोणतेही कारण ऐकले जाणार नाही असे स्पष्ट करून थकबाकीची वसुलीही करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. त्याचबरोबर शहरातील अनधिकृत प्रार्थनास्थळे आणि अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले. धोकादायक इमारतींच्या बाबतीत बोलताना प्रभाग समितीनिहाय धोकादायक इमारतींची पाहणी करून १५ एप्रिलपर्यंत प्राथमिक यादी सादर करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने शहरातील सर्व अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स तसेच अनधिकृत राजकीय बॅनर्स शहरात कुठेही लागणार नाही याची सहाय्यक आयुक्तांनी दक्षता घ्यावी तसेच निवडणुकीच्या काळात शहर स्वच्छ ठेवण्याच्या बाबतीत सर्व स्वच्छता निरीक्षकांनी खबरदारी घ्यावी असेही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.