जिल्ह्यातील विशेष लोक अदालतीत मोटार अपघाताची १३० प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यात यश आलं आहे. जिल्ह्यातील प्रलंबित मोटार अपघात प्रकरणासाठी विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या लोक न्यायालयात मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणात १३० प्रकरणात तडजोड होऊन १० कोटी ७९ लाख रूपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. या लोक न्यायालयात सर्वाधिक म्हणजे ६३ लाख, ५० लाख आणि ४२ लाख अशा तीन मोठ्या रक्कमा पिडीतांना मंजूर करण्यात आल्या. या विशेष लोक अदालतीमध्ये ४८ प्रकरणात आभासी पध्दतीने तडजोड करण्यात आली. त्यामुळे पर जिल्हा आणि पर राज्यात असलेल्या पक्षकारांना दृकश्राव्य माध्यमाद्वारे सहभाग घेता आला आणि त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत झाली अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली.