लॉकडाऊन वाढवण्यापेक्षा कडक निर्बंध लावून सुयोग्य नियोजन करावं अशी मागणी टिसानं पालकमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे शहर आणि जिल्ह्यास कोविड १९ मुक्त करण्यासाठी महापालिका आणि जिल्हा पातळीवर पुन्हा पुन्हा लॉकडाऊन आणि मिशन बीगीन अगेन सारखे प्रयत्न करूनही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी ह्याचा मोठा फटका उद्योगांना बसल्याने अनेक उद्योजक देशोधडीला लागत आहेत. अजुनही शासनाने अत्यावश्यक सेवेशिवाय बाकीचे उद्योग, दुकाने बंद ठेवल्याने त्यांच्यावर जागेचे भाडे, विविध कर, मोठी वीज बिले, पगार, स्थानिक कर अशा एक ना अनेक गोष्टींचा बोजा वाढत आहे. त्यामुळे व्यापार, उद्योगांवर मोठे संकट आले आहे. ह्या गंभीर परीस्थितीत येत्या २० जुलैपासून उद्योग चालू करण्याशिवाय कोणताही पर्याय दिसत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिका-यांना पालकमंत्र्यांनी तशा सूचना द्याव्यात अशी विनंती या निवेदनातून संघटनेच्या आप्पा खांबेटे यांनी केली आहे. सतत लॉकडाऊन करण्यापेक्षा कोरोना विषाणूवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे अत्यंत कडक निर्बंध लादावेत. जे लोक कोरोनाविषयी अटी शर्तीचे काटेकोरपणे पालन करत नाही अशा लोकांना नुसता आर्थिक दंड न ठोठावता कठोर शिक्षा करावी त्यामुळे आपोआपच कारणाशिवाय लोक बाहेर पडणार नाहीत असंही त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. 20 जुलैपासून सर्व प्रकारचे उद्योग आणि व्यावसायिक यापुढेही संपुर्ण काळजी घेऊन उदयोग चालू करतील आणि कोरोनाशी लढण्याकरिता प्रशासनास सहकार्य करतील असं टिसाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.