जिल्हयामध्ये जरी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन साजरा झाला असला तरी हा वर्धापन दिन कोरोनामुळे झाकोळला गेला होता. पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहणही करण्यात आलं. मात्र प्रथमच प्रसिध्दी माध्यमांना या सोहळ्यापासून दूर राहण्याची विनंती करण्यात आली होती. शासकीय सोहळा म्हटलं की नेहमी प्रसिध्दी माध्यमांची तोबा गर्दी असते. पण यंदा मात्र प्रसिध्दी माध्यमांना दूर राहण्याची विनंती करण्यात आली होती. महाराष्ट्र दिनानिमित्तचा वर्धापन दिन सोहळा अतिशय साध्या पध्दतीनं आणि निवडक अधिका-यांच्या उपस्थितीत होणार होता. त्यामुळे या कार्यक्रमाची छायाचित्रं आणि व्हीडीओ प्रसिध्दी माध्यमांना पाठवली जातील. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहू नये अशी विनंती प्रसिध्दी माध्यमांना करण्यात आली होती. तर जिल्हयातील इतर शासकीय, निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था अथवा खाजगी आस्थापना यांनी ध्वजारोहण सोहळा आयोजित करु नये असंही बहुधा प्रथमच सांगण्यात आलं असावं. राज्य स्थापन झाल्यापासून अशाप्रकारची विनंती प्रसिध्दी माध्यमांना कोरोनाच्या सावटामुळे प्रथमच झाली असावी.