राज्यात १ जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून राज्य शासनानं नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी १४ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सध्या कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असली तरी १ जून पर्यंत राज्य शासनाकडून निर्बंध जारी करण्यात आले आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत नवीन नियमानुसार राज्याच्या बाहेरून येणा-या प्रत्येक व्यक्तीला आरटीपीसीआर कोरोना चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट असं बंधनकारक करण्यात आलं असून हा रिपोर्ट प्रवास करण्यापूर्वी ४८ तासापूर्वीचा असावा. माल वाहतूक करणा-या गाड्यांमध्ये चालक आणि क्लिनर या दोघांनाच परवानगी देण्यात आली आहे. तसंच त्यांचाही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असणं गरजेचं आहे. कोविडच्या स्थितीनुसार जिल्ह्यातील अधिका-यांना योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. दूध संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया यावरील निर्बंध शिथील करण्यात आले असून दूध विकण्यास अत्यावश्यक सेवेनुसार परवानगी देण्यात आली आहे. एअरपोर्ट, माल वाहतूक, औषधांचा पुरवठा आणि कोविड व्यवस्थापनातील कर्मचा-यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्यास परवानगी राहील. तसंच स्थानिक जिल्हा व्यवस्थापनाला निर्बंध लादताना ४८ तास आधी माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.