येत्या रविवारी होणारं कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. विशेष म्हणजे जिथे महाभारताचं युध्द झालं त्या कुरूक्षेत्रावरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसणार असल्याचंही सोमण यांनी सांगितलं. रविवार २१ जून रोजी सकाळी १० वाजून २१ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ होणार आहे. दुपारी १२ वाजून १ मिनिटांपासून ते १२ वाजून २ मिनिटांपर्यंत सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राहणार आहे. दुपारी १ वाजून ४८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटणार आहे. मुंबईमध्ये खंडग्रास दर्शन होणार असून सकाळी १० वाजून १ मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहणास प्रारंभ होणार आहे. सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी ग्रहण मध्य असल्यानं सूर्यबिंब जास्तीत जास्त सुमारे ७० टक्के ग्रासित दिसेल. दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. सध्या पावसाळा असल्यामुळं दुपारी सूर्यदर्शन होतं. त्यामुळं सूर्यग्रहणाचं निरिक्षण करता येईल अशी अपेक्षा खगोल प्रेमींना आहे. मात्र साध्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नये ग्रहण चष्म्याचा वापर करावा असं आवाहनही दा. कृ. सोमण यांनी केलं आहे. आता यानंतर २१ मे २०३१ रोजी भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल असं सोमण यांनी सांगितलं.