राज्य शासनानं दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा दिपावली उत्सव साध्या पध्दतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडमुळे गेल्या सात आठ महिन्यात आलेले सर्वधर्मीय सण-उत्सव अत्यंत साध्या पध्दतीनं आणि लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. त्याप्रमाणेच दिवाळीही अत्यंत साध्या पध्दतीनं साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यातील धार्मिक स्थळं अद्याप खुली करण्यात आली नसून दिपावली उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादित राहील याची दक्षता घ्यावी. उत्सव कालावधीत ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घराबाहेर पडणं शक्यतो टाळावे. तसंच नागरिकांनी गर्दी टाळावी जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते त्यामुळं वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. कोरोनामध्ये प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी यावर्षी फटाके फोडणे टाळावे. या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम, दिवाळी पहाट आयोजित करू नयेत. फेसबुक आणि ऑनलाईन पध्दतीने असे कार्यक्रम करावेत. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवण्यास प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना राज्य शासनानं प्रसिध्द केलेल्या पत्रकात देण्यात आल्या आहेत.