मानाची समजली जाणाऱ्या हंडीसाठी मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी 2 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे.धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तीच तरुणाईची धुम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा गुरूवार ७ सप्टेंबर रोजी टेंभीनाक्यावर पहायला मिळणार असून हा दिमाखदार सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे. या दहीहंडी महोत्सवात मुंबई आणि ठाण्यातील गोविंदासाठी वेगवेगळी हंडी लावण्यात येणार आहे. मुंबईतील गोविंदा पथकासाठी आणि ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी 2 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी 1,00,000/- रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 12,000 हजार, सहा थरांसाठी 8,000 हजार, पाच थरांसाठी 6000 हजार तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 5000 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दहीहंडी फोडणा-या गोविंदांच्या सुरक्षेसाठी रॅपलिंगसाठी असणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले. या दहीहंडी उत्सवात नामवंत गायक तसेच चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य आणि संगीतमय जल्लोष असणार आहे. तसेच सुप्रसिध्द मराठी – हिंदी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध नायक/नायिका उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार सुप्रसिध्द लावणी सम्राज्ञी आपल्या आकर्षक नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन तसेच या उत्सवात आपल्या सुमधूर आणि जल्लोषमय गाण्यांनी येणाऱ्या गोविंदांना बेधुंद करणार आहेत. त्याचबरोबर उत्तम असा साउंड तसेच नेत्रदिपक रोषणाई या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहे. तसेच टेंभीनाक्यावर येणाऱ्या गोविंदा पथकांसाठी दुपारच्या जेवणाची सोय करण्यात असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले.