माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व ती मदत करेल अशी ग्वाही अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिली. सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ आणि विजय दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा झाला त्यावेळी रानडे यांनी हे आदेश दिले. संपूर्ण भारतात ७ डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून पाळला जातो. यानिमित्तानं ७ डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधी गोळा केला जातो. देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचं दैनंदिन जीवन सुसह्य व्हावं यासाठी त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या जवानांच्या विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी या निधीचा विनीयोग केला जातो. यावेळी माजी सैनिक प्रकाश नाईक यांचा पॉवरलिफ्टींगमध्ये विशेष गौरव पुरस्कार तर तनुश्री नाईक यांचा फ्री स्टाईल रिले मध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल १० हजारांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.