ठाणे कौटुंबिक न्यायालय, राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि ठाणे जिल्हाधिकारी कौशल्य विकास केंद्राच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महीलांसाठी वयसिध्दता कार्यक्रम साजरा करण्यात आला. महिला घर सांभाळून कार्यालयीन काम सांभाळत आहेत. त्यामुळे या सर्व महिला कर्तुत्ववान असल्याचे सांगत सत्र न्यायालयाचे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश अभय मंत्री यांनी उपस्थित महिलांचा कर्तृत्ववान महिला म्हणून उल्लेख करत महिला दिनाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या. पुरातन काळी पुरुष प्रधान संस्कृती होती. त्यावेळी परदेशात आणि आपल्या देशात देखील या विषमतेच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठविला गेला. ही विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. सर्वात आधी अमेरिका आणि त्यानंतर स्वीडन देशात अशा प्रकारचा प्रयत्न झाला. 1990 आणि 10 मध्ये महिलांनी त्यांचा हक्क मिळवून घेण्यासाठी बंड केले. तेव्हापासून जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. पहिला महिला दिन साजरा साजरा झाला त्यावेळी हा दिवस साजरा करताना ‘भूतकाळातील आनंद आणि भविष्यातील योजना’ अशी थीम होती, आणि आजच्या महिला दिनी ‘ स्त्री – पुरुष लिंग भेद दूर व्हावा आणि समानता मिळावी ‘ ही महिला दिनाची थीम आहे. परंतु हा महिला दिन साजरा होत असताना अनेकांना त्याची थीम माहिती नाही, अशी खंत प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायधिश मंत्री यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यक्त केली. आपल्या घरातील महिलांना समानतेचा दर्जा द्यावा, त्यांना कमी लेखू नये, असेही ते म्हणाले. काही देशात महिला दिनी सुट्टी दिली जाते, तर काही देशात हाफ डे दिला जातो. परंतु आपण मात्र कार्यक्रम साजरा करतो आणि मोकळे होतो. असे कार्यक्रम कशासाठी साजरे करतो, त्याचे महत्व काय हे सगळ्यांनी जाणून घेतले पाहिजे. अशा शब्दात न्यायधीश मंत्री यांनी त्यांचा गौरव केला.यावेळी वकील वर्ग आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कौशल्य विकास केंद्राच्या प्रमुख प्रणिता पगारे यांनीही केंद्राच्या विविध योजना समजावून सांगितल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कौशल्यविकास साध्य करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.