कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महाशिवरात्री उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. महापौर आणि महापालिका आयुक्तांनी हा उत्सव साध्या पध्दतीनं साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. कोविडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षी ‘महाशिवरात्री उत्सव’ अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिकेने केले होतं. महाशिवरात्री हा भारतातील पवित्र उत्सवांपैकी एक मोठा उत्सव मानला जातो . देशभरात हिंदू धर्मीय लोक महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी करतात. महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान तसेच इतर विविध ठिकाणी असलेल्या शिवमंदिरात दरवर्षी शिवभक्त दर्शनाकरीता मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. परंतू यावर्षी कोविडच्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता सर्व शिवमंदिरांवर निर्बंध होते. यामुळं मंदिराच्या बाहेरूनच शिवभक्तांना दर्शन घ्यावं लागत होतं. मंदिरात देवदर्शनासाठी गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे आज ठाण्यातील शिवमंदिरांमध्ये प्रवेश बंद करण्यात आला होता. मंदिरासमोर अडथळे उभे करण्यात आले होते. यामुळं भाविकांना लांबूनच दर्शनावर समाधान मानावं लागत होतं. ठाण्यातील विविध शिवमंदिरांवर रोषणाई करण्यात आली होती. तसंच फुलांनी ही मंदिरं सजवण्यातही आली होती. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरातही नयनरम्य रोषणाई करण्यात आली आहे. मात्र मंदिरात जाता येत नसल्यामुळं भक्तांना लांबूनच याचा आस्वाद घ्यावा लागत होता.