गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प पूर्ण झाल्यानं भविष्यात पाणी टंचाई भासणार नाही असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. धरणाची उंची वाढवल्यानंतर धरण पूर्ण क्षमतेनं वाहू लागले म्हणून सुभाष देसाई यांच्या हस्ते बारवी धरणात जलपूजन करण्यात आलं त्यावेळी देसाई बोलत होते. या धरणाची उंची वाढवण्याचं काम अनेक वर्ष रखडलं होतं. २ वर्षापूर्वी आमदार किसन कथोरे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांना बरोबर घेऊन बैठक घेतली. प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावर तोडगा काढून निर्णय घेतला असं देसाई यांनी सांगितलं. बारवी धरण आता पूर्ण क्षमतेनं भरून वाहताना पाहून आनंद होत असून यामुळं जिल्ह्याला भविष्यात पाणी टंचाई भासणार नाही. पाण्याची पातळी वाढल्यानं कोळे-वडखळ गावात पाणी शिरलं आहे. या गावातील नागरिकांचं सध्या तात्पुरतं पुनर्वसन करण्यात आलं असलं तरी त्यांचंही कायमचं पुनर्वसन केलं जाणार आहे. कोणावरही अन्याय होऊ न देण्याचं शासनाचं धोरण असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.