पोलिसांच्या विनंती नंतर नारळी पौर्णिमा उत्सव रद्द करण्याचा पालिकेचा निर्णय

यावर्षीचा नारळी पौर्णिमा उत्सव रद्द करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने कोळी बांधवांसाठी दरवर्षी नारळी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन मोठ्या स्वरुपात करण्यात येते. या निमित्ताने कळवा सर्कल, क्रिक नाका ते ठाणे पोलिस मुख्यालया समोरील रोड, क्रिक नाका ते सिडको रोड येथे भव्य यात्रा भरते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम करणे योग्य होणार नसल्याने महापालिका प्रशासनाने नारळी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करु नये तसेच त्याअनुषंगाने होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये अशी विनंती ठाणे नगर पोलिसांनी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने यंदा हा उत्सव रद्द केला आहे.
कळवा ब्रीज येथे खाडीत दर्याला नारळ अर्पण करण्यासाठी ठाणे शहर आणि परिसरातील बहुसंख्य कोळी, आगरी बांधव इतर समाजाचे लोक एकत्र येतात. खाडीची पूजा करण्यासाठी तसेच नारळ अर्पण करण्यासाठी या परिसरात 70 ते 80 हजार नागरिक येतात आणि पालखी मिरवणुकीत 400 ते 500 नागरिक सहभागी होतात. यावर्षी 3 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम करणे योग्य होणार नाही. तरी नारळी पौर्णिमेनिमित्त कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करु नये आणि इतर कोणत्याही कार्यक्रमास परवानगी देऊ नये असे विनंती करणारे पत्र ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आर. एम. सोमवंशी यांनी पालिका आयुक्त विपिन शर्मा यांना पाठविले होते. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेनं यावर्षी नारळी पौर्णिमा साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading