ठाणे शहरात पुढील तीन ते चार दिवस कमी पाणी पुरवठा होणार आहे. सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आला असून पुराच्या पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ आणि कचरा जमा झाला आहे. पाण्यासोबत आलेला गाळ आणि कचरा पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने पंपाचा फ्लो कमी झाला आहे. परिणामी शहरात होणारा पाणीपुरवठा तीन ते चार दिवसांपासून कमी प्रमाणात होत असून पाऊस आणि पुराचे पाणी कमी होईपर्यंत पुढील तीन ते चार दिवस पाणीपुरवठा कमी प्रमाणात होणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.