पावसाळ्यात बहुतांशी रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने वाहतूक करणे अत्यंत त्रासाचे होते त्यामुळे नागरिकांचा प्रत्यक्ष रोष महापालिकेवर असतो. पावसाळ्यात कोणत्याही रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी सुचना महापालिका आयुक्तांनी केली आहे. मान्सूनपूर्व करावयाच्या कामांसंदर्भात उपाययोजना करुन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व प्राधिकरणांच्या पावसाळा पूर्व आढावा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. पावसाळापूर्व कामांचा आढावा मे किंवा जून महिन्यात घेवून त्याचा फारसा फायदा होत नाही. अजूनही पावसाळा सुरू होण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे आताच जर खड्डे पडू नये यासाठी रस्त्यांची डागडुजी आणि रस्त्यांखालील कलव्हर्ट आणि नाल्यांची साफसफाई केली तर पावसाळ्याच्या दरम्यान रस्ते चांगले राहतील तसेच पाणी तुंबण्यामुळे रस्ते खराब होण्याच्या घटना कमी होतील, यासाठी बैठक आयोजित केली असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले. डांबरीकरण पध्दतीने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर पावसाळ्यात बहुतांश ठिकाणी खड्डे पडत असतात, त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना ये-जा करणे त्रासाचे होते, काही वेळा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. मुख्य रस्ते हे महापालिकेसहीत वेगवेगळ्या प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार करुन त्यांची निगा देखभाल त्यांच्या मार्फत करण्यात येते. पावसाळ्यामध्ये रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत या दृष्टीने वेळीच सर्व प्राधिकरणांनी नियोजन करुन मे अखेर पर्यत खड्डे पडणार नाही या दृष्टीने कार्यवाही करावे असे आदेश आयुक्त बांगर यांनी बैठकीत दिले. ज्या रस्त्यावर खड्डा आढळून येईल तो रस्ता ज्या प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल याची नोंद घेण्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला. शासनाच्या माध्यमातून 605 कोटीचे अनुदान महापालिकेस प्राप्त झाले असून याची कामे सुरू असून या रस्त्यांची कामे उत्कृष्ट दर्जाची आणि युद्धपातळीवर करावीत, या व्यतिरिक्त जी रस्त्यांची कामे सुरू आहे तेथेही पूर्ण लक्ष केंद्रीत करावे अशाही सूचना यावेळी दिल्या. महापालिकाआणि इतर प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या सर्व रस्त्यांचे जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ऑडिट करणार असून यामध्ये रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आढळ्यास आणि रस्त्यावर खड्डा पडल्यास यामध्ये ज्या प्राधिकरणाची चूक असेल त्या संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरले जाईल असेही बांगर यांनी नमूद केले. मेट्रोच्या माध्यमातून निर्माण झालेले डेब्रीज संबंधितांनी तातडीने उचलावे, तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरीगेटस लावण्यात यावेत. तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील मुख्य रस्ते आणि चौकाच्या ठिकाणी खड्डे पडणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी, असेही महापालिका आयुक्तांनी सांगीतले. कशेळी रस्ता, चिंचोटी अंजूर रस्ता, मनोर – वाडा – भिवंडी रस्ता, कल्याण फाटा, शीळ – महापे रस्ता आदी ठिकाणच्या रस्त्यांची पाहणी करुन संबंधित प्राधिकरणांनी आवश्यक ती कामे पावसा्ळ्यापूर्वी पूर्ण करावीत असेही आयुक्तांनी नमूद केले.