ठाण्यातील पनामा कंपनीतील कामगारांनी आपली थकीत देणी मिळावी यासाठी काल कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. पनामा कंपनीतील कामगारांना गेल्या साडेतीन महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही. त्यामुळं हे सर्व कामगार हैराण झाले आहेत. घराचे हफ्ते, मुलांचं शिक्षण, रोजचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. या कंपनीतील कामगार वेतन मिळावं यासाठी सर्व थरावर प्रयत्न करत आहेत. पण अद्यापही त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं नाही. कंपनीचं व्यवस्थापन जाणूनबुजून कामगारांचे हाल करत असल्याचा कामगारांचा आरोप आहे. खरंतर पनामा कंपनी सुपरमॅक्स नावानं ओळखली जाते. दाढीची ब्लेडस् या कंपनीत निर्माण केली जातात. या कंपनीच्या उत्पादनाला चांगली मागणी असूनही कामगारांचे हाल सुरू आहेत. कंपनीच्या कामगारांची गेल्या अनेक वर्षांपासूनची २५ ते ३० कोटींची रक्कम थकीत आहे. मात्र त्यावरही निर्णय झालेला नाही. कंपनी बंद करण्याचा डाव असल्याचा कामगारांचा आरोप आहे. ५२ लाखांचे उत्पादन होत असतानाही कंपनी कोणाचेच पैसे देत नाही. कोरोना काळात कंपनीतील २६ कामगार मृत झाले. तर ११० कामगार निवृत्त झाले आहेत. पण कामगारांची कोणतीही देणी दिलेली नाहीत. मात्र आयकर खात्याला कामगारांची देणी दिल्याचं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात मात्र वेगळंच चित्र असल्याचं कामगारांचं म्हणणं आहे. सचिन अहिर यांची या कंपनीत कामगार संघटना असून सर्व थरावर प्रयत्न करूनही अद्याप मार्ग निघालेला नाही. या कंपनीपासून अगदी हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री राहतात. मुख्यमंत्री आपल्या वेगवान कामाबाबत प्रसिध्द आहेत. पण सणासुदीच्या दिवसात कामगार वेतनापासून वंचित आहेत त्याकडे मात्र कोणत्याही राजकारण्याचं लक्ष गेलेलं नाही.