अन्न व औषध प्रशासन विभाग हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाचा थेट जनतेच्या जीविताशी संबंध आहे. त्यामुळे या विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कायम सजग राहून जबाबदारीने काम करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आज अन्न व औषध प्रशासन विभागाची कोकण विभागीय आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.मंत्री आत्राम पुढे म्हणाले, या विभागाची जबाबदारी आहे की, त्यांनी अन्न व औषध औषधे याचा दर्जा, मुदत स्वच्छता आदी बाबींची नियमितपणे तपासणी करावी. दूध व त्या व्यवसायाशी संबंधित स्वच्छतेबाबत अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणाने उत्तम काम करावे, यासाठी सर्व प्रकारची आवश्यक ती मदत शासनाकडून दिली जाईल. कोकण विभागातील अन्न व औषध प्रशासन (अन्न) या विभागात एकूण 141 अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून त्यापैकी 69 पदे कार्यरत तर 72 पदे रिक्त आहेत, कर्मचाऱ्यांची 41 पदे मंजूर असून त्यापैकी 17 कार्यरत तर 24 पदे रिक्त आहेत. वर्ग चारची 20 पदे मंजूर असून त्यापैकी 6 कार्यरत तर 14 पदे रिक्त आहेत आणि कंत्राटी कर्मचारी 218 पदे मंजूर असून त्यापैकी 103 पदे कार्यरत तर 115 पदे रिक्त असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. जिल्ह्यात परवानाधारकांची संख्या 22 हजार 821 तर नोंदणीधारकांची संख्या 87 हजार 6 अशी एकूण मिळून 1 लाख 9 हजार 827 आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 14 लाख 27 हजार 400 रुपये इतके शुल्क जमा झाले आहे. संपूर्ण कोकण विभागात परवानाधारकांची संख्या 371 व नोंदणीधारकांची संख्या 1 लाख 68 हजार 108 असे एकूण 2 लाख 5 हजार 169 आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 68 लाख 27 हजार 200 रुपये शुल्क जमा करण्यात आले आहे.अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या ईट राईट चँलेंज स्पर्धेत मीरा-भाईंदर, वाशी नवी मुंबई व ठाणे या या शहरांनी अन्न सुरक्षा मध्ये उच्च गुणांकन मिळविल्यामुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते व अन्न सुरक्षा आयुक्त अभिमन्यू काळे (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत अन्न व औषध प्रशासनातील सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री.दिगंबर भोगावडे, परमेश्वर सिंगरवाड, व्यंकटेश वेदपाठक तसेच अन्न सुरक्षा अधिकारी उत्तरेश्वर बडे,अरविंद खडके, डॉ.राम मुंडे, संतोष शिरोशिया यांचा गौरव करण्यात आला.