नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना वेळीच योग्य माहिती द्या – मुख्यमंत्री

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि काळजीपूर्वक काम करावे तसेच नागरिकांना वेळीच सुचना मिळतील याची काळजी घ्यावी असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं. कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा पावसाळयापूर्वीच्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोकणातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तटरक्षक दल, मस्त्यव्यवसाय विकास, हवामान विभाग, नौदल यांनी बैठकीत आपापल्या तयारीची माहिती दिली तसेच सूचना केल्या. हवामान विभागाने पाऊस, वादळ आणि इतर आपत्तीविषयी प्रशासनाला अद्ययावत माहिती सातत्याने मिळत राहील तसेच त्यामुळे यंत्रणांना सावध राहून बचाव कार्य करता येईल याची काळजी घ्यावी. मासेमारी बोटींशी या काळात संपर्क असावा. त्यांना देखील सूचना मिळत राहतील ते पहावे. वीज प्रतिरोधक यंत्रणा, जिल्ह्याचे नियंत्रण कक्ष देखील व्यवस्थित कार्यान्वित असावेत याची काळजी घ्यावी. गेल्या वर्षी देखील पावसाळ्याच्या काळात पालघरमध्ये लहान लहान भूकंपांची मालिका सुरु झाली होती हे पाहता तेथील यंत्रणेने सावध राहावे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई या चार ठिकाणी लवकरच नवीन रडार उभारण्यात येत असून त्यामुळे हवामानाचा अंदाज अधिक परिपूर्ण आणि अचूक होऊ शकेल अशी माहिती त्यांनी दिली. पूर्वी आपल्याकडे चक्रीवादळाचा धोका नसायचा. पण २०१७ पासून ओखी, वायू, क्यार, निसर्ग यासारख्या चक्रीवादळांनी किनारपट्टीतील भागाचे खूप नुकसान केले असे हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading