कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदाचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ठाणेकरांनी देखील नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करून मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे. याबाबत महापालिकेच्यावतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी उत्सव मंडळांना ठाणे महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यासाठीची ऑनलाईन परवानगी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून यावर्षी कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सदर परवानगी विनाशुल्क देण्यात येणार आहे. यावर्षी मर्यादित आकारमानाचेच मंडप उभारण्यात यावेत. नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा, देवीमुर्तीची सजावट आटोपशीर असावी. तसेच देवीची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट आणि घरगुती मुर्तीकरिता २ फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी. विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. मूर्ती आणताना कमाल ५ व्यक्तीच असाव्यात आणि कोरोना नियमांचं पालन करावं, लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत, नवरात्रौत्सवादरम्यान गरब्याचे आयोजन केले जावू नये. तसेच आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, मंडपांमध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनींगची व्यवस्था असावी. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटणे, फुले आणि हार अर्पण करण्याचे टाळावे, मंडपातील सर्व जबाबदारी पदाधिका-यांवर राहील असे अनेक निर्बंध नवरात्रौत्सवा दरम्यान घालण्यात आले आहेत.