कोरोनानंतर पहिल्यांदाच कोणत्याही निर्बंधाविना दिवाळी साजरी होत असल्याने यावर्षी लोकांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचं दिसून आलं. आज नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. आज पहाटे अभ्यंगस्नानानं मंगलमय वातावरणात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत हा दिवस साजरा झाला. नरक चतुर्दशीचं अभ्यंगस्नान पहाटे धुमधडाक्यात करण्यात आलं. अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी कृष्णानं नरकासूराचा वध केला आणि त्याच्या बंदिवासातील १६ हजार तरूणींची मुक्तता केली. नरकासुराच्या रक्ताचा टिळा लावून कृष्ण सूर्योदयापूर्वीच परत आला. त्यावेळी त्याला अभ्यंगस्नान घालण्यात आलं. या घटनेची स्मृती म्हणून अभ्यंगस्नान केलं जातं. नरकासुराचं प्रतिक म्हणून कारिंटे पायाच्या अंगठ्यानं चिरडून अभ्यंगस्नान करतात. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर, सिध्दीविनायक मंदिर, घंटाळी देवी मंदिर, विठ्ठल सायन्ना दत्तमंदिर इथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ठाण्याचा मासुंदा तलाव, कौपिनेश्वर मंदिर, राम मारूती रस्ता, तरूणांच्या उत्साहानं झळाळून निघाले होते. एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांनी दणक्यात दिवाळी साजरी केली. राम मारूती रस्ता, तलावपाळी परिसरात तरूणाईचा सागर उसळल्याचं चित्र दिसत होतं. विविध संस्थांतर्फे दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामुळं या परिसरात तरूणाईची मोठी गर्दी उसळली होती. दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त राम मारूती रस्ता बंद करण्यात आला होता. कोणत्याही निर्बंधांविना दिवाळी साजरी होत असल्याने सर्वत्र गर्दी आणि वाहतूक कोंडीचा अनुभव येत होता.