आषाढ अमावास्या म्हणजे दिव्यांची अमावास्या काल घरोघरी साजरी करण्यात आली. या अमावास्येला दिव्यांची पूजा करायची असते. या दिवशी स्त्रिया घरातील दिवे घासून – पुसून एकत्र मांडतात, त्यांच्या भोवती रांगोळी घालतात आणि ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करतात. दीपपूजन केल्याने धन धान्य आणि लक्ष्मी प्राप्त होते. प्राचीनकाळी विद्युत दिवे नव्हते पावसाळयात घरात जास्त अंधार होतो, घरातील दिवे सुस्थितीत असावेत. त्यांची देखभाल केली जावी म्हणून कदाचित हे सांगण्यात आले असावे. अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. आषाढ अमावास्येनंतर पवित्र श्रावण मास सुरू होतो. श्रावण महिन्यात मद्यपान, मांसाहार वर्ज्य सांगण्यात आला आहे. त्यामुळे मांसाहारी लोक आषाढ अमावास्येलाच मांसाहार करून घेतात. मद्यप्राशन करणारे मद्यपानही करून घेतात. या दिवशी अतिमद्यपान केल्याने काहीजण रस्त्यावर पडतात म्हणून कदाचित आषाढ अमावास्येस गटारी अमावास्या म्हणण्याची प्रथा रूढ झाली आहे. गटारी अमावास्येनिमित्त चिकन, मटण घेण्यासाठी रांगा लावल्याचं चित्र काल दिसत होतं.