जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेला दिवाळीनंतर गती मिळाली असून कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळी सातपर्यंत ६१ हजार १६० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. गेल्या काही दिवसातील ही सर्वोच्च कामगिरी आहे. शेतीची कामे आणि दिवाळी सणामुळे जिल्ह्यात लसीकरण मोहिमेची गती कमी झाली होती. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आढावा बैठक घेऊन दिवाळीनंतर लसीकरण मोहिमेला गती देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दिवाळी नंतरच्या पहिल्या दिवशी झालेल्या लसीकरण मोहिमेत गेल्या काही दिवसातील विक्रमी कामगिरीची नोंद आज दिवसभरात झालेल्या लसीकरणामुळे नोंदविली गेली.
आज ६१ हजार १६० नागरीकांना लस दिली त्यामुळे आतापर्यंत एकूण लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या ८३ लाख ८० हजार ५७२ झाली आहे. त्यापैकी ५५ लाख ३० हजार ९४४ नागरिकांना पहिल्या डोसचे तर २८ लाख ४९ हजार ६२८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४२९ सत्र आयोजित करण्यात आले.