दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षा तयारीसाठी गेलेल्या आणि लॉकडॉऊनमुळे अडकलेल्या 1600 मराठी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परतण्यासाठी दिल्ली ते भुसावळ या विशेष ट्रेनच्या प्रवासाला मान्यता दिली आहे. दिल्लीत अडकलेल्या या मराठी मुलांची परतण्याची व्यवस्था करण्यासाठी शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. येत्या शनिवारी 16 मे रोजी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्टेशनवरून ही विशेष ट्रेन सुटणार असून रविवार 17 मे रोजी भुसावळ स्टेशन येथे पोहोचणार आहे. विद्यार्थ्यांना इच्छितस्थळी स्टेशनवर उतरण्यास परवानगी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पुणे, कल्याण आदी स्टेशनवरही ट्रेनला थांबा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.