डोंबिवली-तळोजा पाठोपाठ दहीसर ते मीरा-भाईंदर मेट्रो मार्गाचंही उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी दहीसर ते मीरा-भाईंदर मेट्रो मार्गासाठी २००९ पासून पाठपुरावा केला होता. गेल्या वर्षीच दहीसर ते मीरा-भाईंदर या मेट्रोला मंजुरी मिळाली होती. गेल्या महिन्यात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यावेळी १५ ऑगस्ट पूर्वी मीरा-भाईंदर मेट्रोचं काम सुरू करण्याचं आश्वासन मुंबई महानगर विकास प्राधिकरणानं दिलं होतं. आता मेट्रोच्या कामाची निविदा प्रक्रिया आणि एकूण सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतर मीरा-भाईंदर मेट्रोच्या प्रस्तावित मार्गाला सुरूवात होईल असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. गायमुख ते शिवाजी चौक या मेट्रोचं भूमीपूजन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या मुंबई मेट्रो १० चा मार्ग ९ किलोमीटरचा आहे. ठाणे ते काशिमीरा-मीरा-भाईंदर-दहीसर आणि पुढे मुंबई अशा मेट्रोची रिंग मेट्रो व्हावी आणि सर्व मेट्रो एकमेकांना जोडल्या जाव्यात असा प्रताप सरनाईक यांचा प्रयत्न होता. ठाणे मेट्रोचं काम सुरू झालं असून दहीसर ते मीरा-भाईंदर या मार्गावर मेट्रोचं काम १२ सप्टेंबर पासून सुरू होईल. गायमुख ते मीरारोड या मेट्रो मार्गाचंही भूमीपूजन होत आहे. त्यामुळं भविष्यात ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई ही शहरं एकमेकांना जोडली जाणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.