त्रिपुरारी पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी झाली. देवांनी दैत्यांवर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. काल ठिकठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो. शंकरानं त्रिपुरासूर या राक्षसाचा वध करून त्यानं निर्मित केलेली तीन शहरंही नष्ट केली तो दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता म्हणून देवांनी दैत्यावर मिळवलेला विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्रिपुरासूर हा बलवान राक्षस होता. त्यानं शंकराची भक्ती करून शंकराचे आशीर्वाद मिळवले. या आशीर्वादानं त्याची शक्ती आणखी वाढली आणि तो कुणालाच ऐकेनासा झाला. अगदी देवांवरही हल्ला करायला त्यानं मागेपुढे पाहिलं नाही. ब्रह्म आणि विष्णूही त्याच्यापुढे हतबल झाले होते. शंकराकडून मिळालेल्या वरामुळं त्रिपुरासूराला कुणीच काही करू शकत नव्हतं. अखेर सर्व देवांनी शंकराचा धावा केला आणि शंकरानं तीन दिवस युध्द करून त्रिपुरासुराचा वध केला. त्यादिवशी कार्तिक महिन्यातील पौर्णिमा होती. त्रिपुरासूराच्या अत्याचारातून देव मुक्त झाल्यामुळं देवांनी दिवाळी साजरी केली. शंकराच्या सन्मानार्थ तेव्हापासून दीपोत्सव साजरा करण्याची प्रथा पडली आहे. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर, रायलेश्वर महादेव मंदिरासह विविध मंदिरातून दिव्यांची आरास करण्यात आली होती. काही मंदिरांमध्ये भव्य रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. पणत्या लावून मंदिराचा परिसर सजवण्यात आला होता. यामुळं विविध मंदिरांचा परिसर उजळून गेल्याचं दिसत होतं.