ठाण्यामध्ये महापालिकेनं लॉकडाऊन वाढवल्यामुळे सर्वसामान्य ठाणेकरांना जीवनावश्यक वस्तू म्हणजे भाजीपाला, अन्नधान्य घेणंही अवघड झालं आहे. ठाणे महापालिकेनं कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी गेल्या आठवड्यात लॉकडाऊन वाढवलं होतं. मात्र लॉकडाऊन वाढवूनही रूग्णांच्या संख्येत कोणतीच घट झालेली नाही. एकीकडे महापालिका लॉकडाऊन कडकपणे राबवत असताना दुसरीकडे छुप्या पध्दतीने भाजीपाला, अन्नधान्यांची विक्री सुरू आहे. नेहमी बसणा-या भाजी विक्रेत्यांना पालिका आपला व्यवसाय करू देत नाही तर दुसरीकडे रात्रीच्या अंधारात खुलेआम भाजीविक्री सुरू आहे. कळवा परिसर, जवाहरबाग येथे रात्री १ पासून पहाटेपर्यंत भाजी विक्रीचा धंदा खुलेआम सुरू आहे. या ठिकाणी भाजी विक्री होताना सर्व प्रकारचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. दुसरीकडे काही अन्नधान्याच्या दुकानातूनही ग्राहकांना मध्यरात्रीनंतर खरेदीसाठी बोलावलं जात आहे. त्यामुळं प्रमाणिक विक्रेते आणि सर्वसामान्य ग्राहक यात भरडला जात आहे. पालिका याकडे लक्ष देणार का हाच खरंतर प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.