ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. य. गोखले यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना ज्युपिटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज साडेअकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८९ वर्षांचे होते. वयाच्या साठीनंतर त्यांनी विधी शाखेचं शिक्षण घेऊन त्यात पदव्युत्तर पदवी मिळवली. भारत सहकारी बँकेचे संस्थापक संचालक आणि अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यांचा अनेक सामाजिक संस्थांशी संबंध होता. कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे अध्यक्ष तसंच ८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यांच्या निधनानंतर पालकमंत्र्यांसह अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. गोखले यांच्या निधनामुळे मोठी हानी झाली अशा शब्दात पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गोखले यांच्या मागे मुलगा, मुलगी, सूना, नातवंडं, जावई असा परिवार आहे.