ठाणे न्यायालयात नूतन लोक अभिरक्षक कार्यालयाचं उद्घाटन

ठाणे न्यायालयात नूतन लोक अभिरक्षक कार्यालयाचं उद्घाटन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं. न्यायलयीन बंदी तसंच कारागृहामध्ये दिवसेंदिवस क्षमतेपेक्षा जास्त वाढत चाललेली बंद्यांची संख्या आणि त्यामुळे न्यायालयीन प्रशासन, कारागृह प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर वाढता ताण निर्माण होत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. बहुतांश बंदी हे केवळ आर्थिक विवंचनेमुळं विधीज्ञ नेमू शकत नाहीत आणि त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना तुरूंगात डांबून रहावं लागतं. त्यातून मार्ग काढण्यासाठी न्यायालयीन बंद्यांकरिता ठाणे न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालय अंतर्गत बचाव पक्ष प्रणालीचे कामकाज मार्चपासून सुरू करण्यात आले आणि त्यासाठी १० विधीज्ञांची पूर्ण वेळ नेमणूक करण्यात आली आहे. ही प्रणाली सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत १६० बंद्यांना विधी सहाय्य देऊन त्यांची कारागृहातून मुक्तता करण्यात आली आहे. दिवसेंदिवस बचाव पक्ष प्रणालीचे कामकाज वाढत असल्याने आणि कामाचा बोजा लक्षात घेता कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण विधी सहाय्य देण्यासाठी बचाव प्रणालीस स्वतंत्र आस्थापनेची गरज भासत असल्याने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या इमारतीच्या तळ मजल्यावर स्वतंत्र नूतन लोक अभिरक्षक कार्यालय बांधण्यात आलं. यामध्ये चिफ डिफेन्स लिगल एड कौन्सिल, डेप्युटी चिफ डिफेन्स लिगल एड कौन्सिल आणि असिस्टंट डिफेन्स लिगल एड कौन्सिलच्या नियुक्त विधिज्ञांकरिता स्वतंत्र कक्ष, पक्षकारांसाठी बैठक व्यवस्था, ग्रंथालय, संगणक प्रणाली आदी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यालयाचं नुकतंच प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading