ठाणे जिल्ह्यात आज सर्वत्र ईद साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या मशिदींमध्ये आज सकाळी नमाज अदा करण्यात आला. ठाण्यातील राबोडी, चरई, धोबीआळी भागातील मशिदींमध्ये मोठ्या संख्येनं अबालवृध्द नमाज अदा करण्यासाठी जमले होते. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरही नमाज अदा करण्यासाठी गर्दी झाली होती. ईद उल दुहा म्हणजे कुर्बानीची ईद समजली जाते. रमझानचे रोजे संपल्यानंतर ईद उल फित्र साजरं करण्यात येतं. तसंच इस्लामी वर्षाचा शेवटचा महिना जील हजची सुरूवात झाल्यावर दहा दिवसांनी ही ईद साजरी करण्यात येते. याच महिन्यात हज यात्राही असते. म्हणून या महिन्याला जील हज असंही नाव देण्यात आलं आहे. कुर्बानी आणि हज या दोन्ही विधींचं महत्व असून त्यांचा संदेश मात्र एकच आहे. मानव जातीच्या कल्याणासाठी त्याग करा आणि आहुतीसाठी तयार रहा असा ईश्वरानं संदेश दिला आहे.