स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित कायदेविषयक जागरुकता आणि प्रसाराद्वारे नागरिकांचे सक्षमीकरण अभियान आणि कारागृहातील बंदीजनांसाठी ‘हक्क हमारा भी तो है @७५’ या अभियानाअंतर्गत आज सकाळी ठाण्यात कायदेविषयक जनजागृती महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या हस्ते टेंभीनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून रॅलीस सुरुवात करण्यात आली. ही महारॅली ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालय येथून तलाव पाळी सिग्नल अशी जावून पूर्ण तलावपाळीस फेरी मारण्यात आली. यावेळी विधी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कायदेविषयक विषयांवर पथनाटय, माहिती फलक याद्वारे जनजागृती केली. या महारॅलीची सांगता जिल्हा न्यायालय येथे करण्यात आली. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुके, ग्रामपंचायत, गाव -पाडे येथे विविध कायदेविषयक जनजागृती शिबीर घेऊन नागरिकांमध्ये कायदेविषयक सशक्तीकरण करण्यात आले. “हक हमारा भी तो है/७५” या अभियानांतर्गत ठाणे मध्यवर्ती कारागृह, कल्याण येथील जिल्हा कारागृह वर्ग-१ यामधील शिक्षाधीन आणि न्यायाधीन बंदी यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून माहिती संकलित करण्यात आली. तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत त्यांना मोफत विधी सहाय्य आणि त्यांचे अधिकार यांची माहिती विविध कार्यक्रमांद्वारे कायदेशीर जनजागृती करण्यात आली. या अभियानाच्या कालावधीत संपूर्ण जिल्हयात प्रत्येक स्तरावर मोठया प्रमाणात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमांद्वारे नागरीकांचे कायदेविषयक सक्षमीकरण करण्यात आले आहे.