माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेतर्गत आजपर्यंत ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात १ लाख २७ हजार ९२७ कुटूंबांचे प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे ३१.२२ टक्के आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागात या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी गावकरी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक युवकांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी केले आहे. ठाणे ग्रामीणमध्ये पहिला टप्पा दिनांक १५ सप्टेंबरपासून सुरू झाला असून जिल्ह्यातील मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण, शहापूर या पाच तालुक्यातील प्रत्येक गावोगावात ही मोहीम राबवली जात आहे. यासाठी ६३२ पथकं तयार करण्यात आली आहेत. या पथकात आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आणि स्थानिक स्वयंसेवक यांचा समावेश असून त्यांच्या मार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. या मोहिमेची व्यापकता वाढविण्यासाठी गावातील नागरिक, विविध सेवाभावी संस्था, युवकवर्गाने स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन मोहिमेत सहभाग घ्यायला हवा. आतापर्यंत मोहिमेतर्गत १ लाख २७ हजार ९२७ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले असून ५ लाख १८ हजार ३९८ नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले आहे.