दैनंदिन कामकाज करताना अधिकारी-कर्मचा-यांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं, यासाठी एखादा आवडीचा खेळ खेळायला हवा. निरोगी आयुष्य जगण्याची गुरूकिल्ली खेळ असून महिन्याला मिळणा-या पगारापेक्षा खेळातून मिळणारा आनंद जास्त असल्याचं मत राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी व्यक्त केलं. ठाणे जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी वार्षिक क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद कर्मचारी हा जिल्हा परिषदेचा कणा आहे. वर्षभर विविध कार्यालयीन कामात व्यस्त असणा-या कर्मचा-यांसाठी केवळ एक दिवसीय क्रीडा स्पर्धा न भरवता पुढील वर्षापासून तीन दिवसांची क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येईल अशी घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांनी केली. या स्पर्धेत पाच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मुख्यालयातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. सांघिक स्पर्धेत एकूण ८ संघ तयार करण्यात आले होते. यावेळी महिला आणि पुरूषांच्या स्वतंत्र सांघिक आणि वैयक्तीक स्वरूपाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये क्रिकेट, कबड्डी, लंगडी, गोळाफेक, १०० मीटर धावणे, बुध्दीबळ, कॅरम, तीन पायांची शर्यत अशा स्पर्धांसह ५० वर्षावरील अधिकारी-कर्मचा-यांसाठीही विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं.