ठाणे शहरातील बी केबीन भागात राहणारे ज्येष्ठ लेखक, तत्वचिंतक प्रा. डॉ. सुधीर मोंडकर यांचे शनिवारी रात्री 8 च्या सुमारास अकस्मात निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने ठाणे शहरातील साहित्य, कला, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली. जवाहरबाग स्मशानभुमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ठाण्यातील विविध वृत्तपत्रांत त्यांचे सातत्याने लेखन असायचे तसेच मराठी विश्व कोष निर्मिती मंडळावर लेखक संपादक मंडळात त्यांनी कार्य केले आहे. वागण्यात आणि बोलण्यात सौम्य आणि मृदू असणारे सुधीर मोंडकर विद्वान होते. ते मुंबई विद्यापीठाचे पी. एच. डी. होते. शिवाय ते अनेक पदव्युत्तर आणि पी. एच. डी. विद्यार्थी वर्गाचे मार्गदर्शक होते. गेली 40 वर्षाहून अधिक काळ ते मुक्त पत्रकार होते. त्यांना आणि त्यांच्या पुस्तकांना मानाचे पुरस्कारही लाभले होते. त्यांनी लिहिलेली दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्यावर पुस्तके आवर्जून वाचावी अशी आहेत. तसेच मनोहर पर्रीकर आणि शरद पवार ह्यांच्या आईवडिलांवर लिहिलेले आबाई ही पुस्तके गाजली होती. पर्रीकर ह्यांच्या वरील पुस्तकाला त्यांना राज्य पुरस्कारही मिळाला होता. अनेक निबंध, शोध निबंध त्यांच्या नावावर आहेत. ते उत्कृष्ठ निवेदक आणि वक्ते सुद्धा होते. आकाशवाणी वर सुद्धा त्यांचे कार्यक्रम व्हायचे. अनेक क्षेत्रांशी त्यांचा संबंध होता. ते अतिशय अभ्यासू होते. अंकशास्त्र आणि अंकावरून भविष्य सांगण्याचा सुद्धा अभ्यास होता. शिडशिडीत, नेहमी टापटीप आणि नेटके राहणारे होते. त्यांच्या अकस्मात जाण्याने शिक्षण, साहित्य आणि पत्रकारिता ह्या क्षेत्रांचे नुकसान झाले आहे. दैनिक जनादेशमध्ये त्यांचे ‘मल्लीनाथी’ हे सदर खुप गाजले होते. तसेच दिवाळी अंकासाठीही त्यांनी अनेक साहित्य लेखन केले होते.