ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पावसानं झोडपून काढलं असून ठाण्यात आज सकाळी साडेआठपासून दुपारपर्यंत ३२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेले ८ दिवस ठाण्यात मुसळधार पाऊस होत असून विक्रमी पावसाची नोंद होत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत असून कामानिमित्त बाहेर पडणा-यांना याचा मोठा फटका बसत आहे. जिल्ह्यामध्येही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात १९७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ६८४ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या धरणामध्ये १३० मीटर पाण्याचा साठा आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत हा साठा ११४ मीटर होता. बारवी धरणातून ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा केला जातो. बारवी धरणातही समाधानकारक पाणीसाठा असून सध्या बारवी धरणात ५५ टक्के पाणीसाठा आहे. बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात १२० मिलीमीटर पाऊस झाला आहे.