जिल्ह्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब अजमावत असलेल्या एकूण 66 उमेदवारांपैकी 27 उमेदवार हे अल्पशिक्षित आहेत. जिल्ह्यामध्ये ठाणे कल्याण आणि भिवंडी असे लोकसभेचे तीन मतदारसंघ आहेत. या तीन लोकसभा मतदारसंघात 66 उमेदवार आपलं नशीब अजमावत आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 23 उमेदवार निवडणूक लढवत असून यामध्ये 11 उमेदवार हे शालान्त परीक्षा उत्तीर्ण आहेत, चार उमेदवार हे अकरावी बारावी उत्तीर्ण आहे, पाच उमेदवार हे महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले आहेत, तीन उमेदवार हे द्विपदवीधर आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यापैकी एक अशिक्षित आहे. शालान्त परीक्षा उत्तीर्ण असलेले अकरा उमेदवार आहेत, अकरावी बारावी उत्तीर्ण असलेले चार उमेदवार, महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले आठ उमेदवार तर पदवीधर असलेले चार उमेदवार कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघात पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यापैकी पाच जण हे शालान्त परीक्षा उत्तीर्ण, दोन उमेदवार हे अकरावी बारावी पर्यंत शिक्षण घेतलेले, सहा उमेदवार महाविद्यालयीन शिक्षण घेतले, दोन उमेदवार हे द्विपदवीधर आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे आणि वंचित बहुजन आघाडीचे अरुण सावंत हे द्विपदवीधर आहेत, कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत, अरुण सावंत यांनी डॉक्टरेट मिळवली असून त्यांनी राजस्थान मधील विद्यापीठाचा कुलगुरुपद भूषविले आहे, अमरीश मोरजकर आणि अस्मिता पुराणीक हे दोन अपक्ष उमेदवार वैमानिक आहेत, भिवंडीतील काँग्रेसचे उमेदवार सुरेश तावरे हे एफ वाय बी कॉम आहेत तर भारतीय जनता पक्षाचे कपिल पाटील हे कला शाखेतील पदवीधर आहेत, शिवसेनेचे राजन विचारे हे 11 वी उत्तीर्ण आहेत.