शालेय मुलांमध्ये सुरक्षित अन्न आणि आरोग्यदायी आहाराबाबत जागृती व्हावी. तसेच त्यांनी शाळांमध्ये असताना पौष्टिक अन्न खावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांनी ‘ईट राईट स्कूल’ उपक्रमात सहभागी होवून प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत सुरक्षित अन्न आणि आरोग्यदायी आहार संबंधीच्या ठाणे जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी जिल्हाधिका-यांनी हे निर्देश दिले. सर्वसामान्य जनतेला सुरक्षित अन्न आणि आरोग्यदायी आहार याबाबत शास्त्रीय माहिती देण्यासाठी तसंच अन्न – औषध प्रशासन विभागाच्या विविध उपक्रमांबाबत माहिती होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामकाज करावे. हॉटेल मधील स्वच्छता मानांकनाबाबत सर्वसामान्य जनतेला माहिती होण्यासाठी विभागाने उपाययोजना कराव्या. तसेच जिल्ह्यातील सर्व शिवभोजन केंद्रांचे स्वच्छता मानांकन करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. ईट राईट स्कुल उपक्रमात जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांनी सक्रिय सहभागी व्हावे असे निर्देश देऊन आतापर्यंतच्या उपक्रमातील प्रगतीबाबत जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. क्लिन स्ट्रीट फुड हब अर्थात स्वच्छ खाऊ गल्ली आणि स्वच्छ, ताजे फळ- भाजीपाला मार्केट या उपक्रमांसाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. तसेच ईट राईट इंडिया अभियाना संदर्भात प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करावा. तळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्यतेलाचा पुर्नवापर टाळावा आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी टीपीसी मीटर खरेदी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सुदृढ आरोग्यासाठी नागरिकांनी मीठ, साखर, तेलाचा वापर कमी करण्याचा निर्धार करावा असे आवाहनही शिनगारे यांनी यावेळी केले.