गेल्या तीन-चार दिवसापासून पुन्हा पावसानं दडी मारली असून जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी धरणं अजून अर्ध्यावरही भरलेली नसल्याचं दिसत आहे. या महिन्याच्या सुरूवातीला पावसानं दमदार हजेरी लावली होती. पण नंतर मात्र पावसानं दडी मारली असून तापमानातही कमालीची वाढ झाली आहे. धरण क्षेत्रातही यंदा पावसाची हजेरी चिंताजनकच आहे. जिल्ह्यातील भातसा धरणात पाणी साठवण्याची क्षमता ९४२ दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात ४५५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४८ टक्के पाणी साठा आहे. तर गेल्या वर्षी आत्तापर्यंत ६० टक्के एवढा पाणी साठा होता. तर बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ३३८ दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात १५५ दशलक्ष घनमीटर म्हणजे ४६ टक्के पाणी साठा आहे. तर गेल्यावर्षी तो ८० टक्के इतका होता. त्यामुळं पावसानं अजून प्रतिक्षा करायला लावल्यास पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची भीती व्यक्त होत आहे.