चला जाणूया नदीला उपक्रमाअंतर्गत भिवंडी तालुक्यातील भातसा नदी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत भातसा, कुंभेरी नदीतील प्रदुषण कमी करून ती नदी प्रवाही करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील दहा नद्यांमधील प्रदुषण कमी करून त्या प्रवाही करण्यासाठी चला जाणूया नदीला उपक्रमाअंतर्गत काम सुरू आहे. या अंतर्गत हा नदी संवाद उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी भातसा आणि कुंभेरी नदी किनाऱ्यावरील अतिक्रमणे, नदी प्रदुषित करणाऱ्या घटकांची पाहणी करून ही अतिक्रमणे हटविण्याविषयी निर्देश भिवंडीचे तहसीलदार आदिक पाटील यांनी संबंधितांना दिले. नदी किनाऱ्यावरील अतिक्रमणे, वेअर हाऊस, कँटिन, अनधिकृत मांगूर माशांचे तलाव यामुळे नदी प्रदुषित होत असल्यामुळे ही अतिक्रमणे हटविण्याची मागणी डॉ. स्नेहल दोंदे यांनी यावेळी केली. मनरेगा मार्फत नदी खोलीकरण करून वेगवेगळ्या जलसंधारणाची कामे करून नद्यांचे खोलीकरण करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच जानेवारीमध्ये या नद्यांचा सखोल अभ्यास करण्याचे ठरविण्यात आले.