चला जाणुया नदीला” अभियाना अंतर्गत ठाण्यातील खाडी किनारा तलावांची जिल्हास्तरीय समितीने पाहणी केली. ठाणे महापालिकेने नागरिकांकरिता मुंब्रा-पारसिक,रेतीबंदर घाट, साकेत बाळकुम आणि कोपरी घाट येथे उत्तम सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. गणेशोत्सव,नवरात्रौत्सव तसेच इतर धार्मिक कार्यासाठी विसर्जन घाटावर नागरिक येत असतात. नागरिकांच्या सोईसाठी विसर्जन घाटावर सूचना फलक आणि निर्माल्य कलश उपलब्ध करावेत अशा सूचना “चला जाणुया नदीला” या नदी संवर्धन अभियाना अंतर्गत महाराष्ट्र शासनाद्वारे नियुक्त जिल्हास्तरीय समितीच्या समन्वयकांनी पालिकेला दिल्या आहेत.
भारताच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षात सुरू झालेल्या “चला जाणुया नदीला” या नदी संवर्धन अभियाना अंतर्गत महाराष्ट्र शासनाद्वारे नियुक्त जिल्हास्तरीय समितीच्या समन्वयक आणि जलनायिका स्नेहल दोंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महानगरपालिका आणि इतर शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत खाडी किनारा आणि तलावांची पाहणी केली. पाहणीच्या वेळी महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या वॉटर फ्रंटच्या कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. महानगरपालिकेने भाडेतत्वावर दिलेल्या काही तलावांची उदा.घोसाळे तलाव, हरियाली तलाव पाहणी देखील त्यांनी केली. महापालिकेद्वारे राबविण्यात येत असलेल्या योजनांमुळे तलाव आणि तलाव परिसर स्वच्छ आणि सुंदर राहत असून शाश्वतपणे त्यांचे संवर्धन होत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. काही नाल्यांमधुन सांडपाणी खाडीत जाऊन प्रदूषण होत असल्याने त्याचे स्वच्छतेच्या प्रक्रियेबाबत महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा तसेच STP द्वारे प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी महानगरपालिकेने योजना आखावी असे त्यांनी सुचित केले.