तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एमएमआर क्षेत्रात दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून ठाणे शहरात देखील त्याचा प्रभाव जाणवत असल्याने या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे. कालरात्री पासून शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या चक्रीवादळामुळे वाहणारा सोसाट्याचा वारा आणि अतिपर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या वतीने सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. यामध्ये झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. महापालिकेची सर्व यंत्रणांना सतर्क आणि सुसज्ज असून मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.