चंद्रभागेच्या पवित्र पात्रात स्नान केलेल्या विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेण्याची संधी ठाणे-कळवेकरांना प्राप्त झाली आहे. कळव्यातील कावेरी सेतू येथे ही मूर्ती ठेवण्यात येणार आहे. पहाटे ५ वाजल्यापासून या मूर्तीचं दर्शन घेता येणार असल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. यालाच आषाढी वारी म्हणतात. आषाढीला पंढरपूरास शेगाव येथून गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते. या धकाधकीच्या जीवनात श्रमिकांना विठ्ठलाची आस लागलेली असतानाही पंढरपूरला येता येत नाही. त्यामुळं ठाणे-कळव्यातील विठ्ठल भक्तांना आपल्या दैवताचं दर्शन घेता यावं यासाठी विठ्ठल-रखुमाईच्या ४ फूटी मूर्तीला कावेरी सेतू येथे स्थानापन्न केलं जाणार आहे. पंढरपूर येथील विठ्ठल भक्त अमरजित पाटील यांनी शाळीग्रामाच्या अखंड पाषाणातील ही मूर्ती चंद्रभागेमध्ये स्नान करून ठाण्यात आणली आहे. पहाटे ५ वाजता पूजा करून दर्शन सोहळ्याला सुरूवात होणार आहे. तसंच यावेळी १० हजार विठ्ठल भक्तांना विठ्ठल रखुमाईची मूर्ती प्रदान केली जाणार असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.