पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये पिंपळशेत गावातील एका महिलेनं गरिबीला कंटाळून आपल्या दोन मुलींना विष पाजत आत्महत्या केली आहे. मात्र यामध्ये आईचा मृत्यू झाला असला तरी एक मुलगी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. रूक्षणा हांडवा असं आत्महत्या करणा-या महिलेचं नाव आहे. तिला ४ मुली असून वृषाली ही ८ महिन्यांची मुलगी जिवंत राहिली असून तिची श्रमजीवी संघटनेच्या विवेक पंडीत यांनी भेट घेऊन विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून या बालिकांना वयाच्या १८ वर्षापर्यंतच्या प्रत्येकी २ लाखाच्या मुदत ठेवी घोषित केल्या आहेत. रूक्षणा आपल्या ४ मुलींसह पिंपळशेत गावातील खरोडा येथे राहत होती. जूनमध्ये तिच्या नव-यानं आत्महत्या केली होती. नव-याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची परवड सुरू झाली. त्याला कंटाळून रूक्षणानं घरी असलेल्या दोन मुलींना विष पाजलं आणि स्वत:ही आत्महत्या केली. पाचवीला असलेलं दारिद्र्य, लहान मुली, रोजगाराचा अभाव यामुळं पैसेही नाहीत, त्यामुळं कुटुंबाचं पोट कसं भरायचं या विवंचनेत त्या त्रासून गेल्या होत्या. रोजच्या जेवणाचीही भ्रांत असल्यानं त्यांनी दीपाली आणि वृषाली या आपल्या लहान मुलींना विष पाजून स्वत:ही आत्महत्या केली. त्यांची मोठी मुलगी सुमन तिसरीत तर जागृती ही पहिल्या इयत्तेत शिकत आहे. सुमन आणि जागृती यांना शासकीय आश्रमशाळेत निवासी प्रवेश द्यावा असे निर्देश राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी अधिका-यांना दिले आहेत.