सर्व शासकीय कर्मचा-यांनी हेल्मेट घातली पाहिजेत असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. कोणतंही दोन चाकी वाहन रस्त्यावर चालवताना हेल्मेट परिधान करणं सक्तीचं आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळं, महापालिका, नगरपालिका, शाळा, महाविद्यालय, सर्व शासकीय यंत्रणांच्या कार्यालयात काम करणा-या अधिकारी-कर्मचा-यांनी दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचारी मोटार वाहन अधिनियमानुसार शिक्षेस पात्र राहील, त्याची गंभीर दखल घेतली जाईल असं जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केलं आहे. जिल्ह्यामध्ये २०१७ च्या जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत २०१ अपघाती मृत्यू, ५०५ गंभीर जखमी तर ३८६ किरकोळ जखमी झाले होते तर यावर्षी म्हणजे जानेवारी ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत २२९ मृत्यू, ५६२ गंभीर जखमी तर ३३४ किरकोळ जखमी झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २८ मृत्यू आणि ५७ गंभीर जखमी अधिक असल्याचं दिसत आहे.