संविधान दिनाचे औचित्य साधून गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानक परिसरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो लोकांनी प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. 73वा भारतीय संविधान दिन ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संविधान दिनाचे औचित्य साधून ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुशोभिकरण केले होते.मेणबत्ती प्रज्वलित करुन भैय्यासाहेब इंदिसे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी 395 व्या खोलीत पहिली शाळा सुरू केली म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी 395 कलमांचे संविधान दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसात लिहिले आहे. किंबहुना, त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आज आपला देश एकसंघ राहिला आहे. त्यांचे हे उपकार देश कधीच फेडू शकणार नाही असे भैय्यासाहेब इंदिसे यांनी सांगितले. अशोक वैती यांनी यावेळी, एक दिवस संविधान दिन साजरा करुन चालणार नाही. तर बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व समावेशक ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरु करण्याची कार्यवाही पालिकेने सुरु करावी, अशी मागणी केली.